Saturday, November 24, 2018

जिहाद : समज-गैरसमज


जिहाद : समज-गैरसमज
सध्या भारतातच नाही तर संपूर्ण जगात जिहाद हा शब्द प्रमाणापेक्षा जास्तच चर्चेत आहे. जिहाद हे दहशतवादाचंच दुसरं रूप आहे! असा समज बहुसंख्य लोकांनी करून घेतला आहे अथवा तसा (गैर)समज लोकांमध्ये जाणीवपूर्वक रुजवला गेला आहे! असे म्हणणे कदाचित वावगे होणार नाही. जिहाद शब्दाचा खरा अर्थ कुराणाचा आधार घेतल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. कुराण हा मुस्लिमांचा पवित्र धर्म ग्रंथ! याचा आधार घेऊन आपण जिहाद ह्या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू.
जिहाद म्हणजे काय तर सरळ सोप्या शब्दात धर्मयुद्ध! सर्वप्रथम युद्ध आणि धर्मयुद्ध यातला मूळ फरक याठिकाणी आपण समजावून घेतला पाहिजे.
युद्ध म्हणजे दोन समूहा दरम्यान घडून आलेला हत्यारबंद संघर्ष. यामागील हेतू वेगवेगळे असू शकतात. साम्राज्यवाद हा इंग्रजांच्या युद्धनीतीचा एक भाग होता. अफगाण, तुर्कस्थान इत्यादी सत्ताधाऱ्यांनी हिंदुस्थानावर केलेले आक्रमण हे सत्तेसाठी होते. परंतु धर्मयुद्ध ह्या शब्दाची व्याख्या मात्र फारच व्यापक आहे. धर्मयुद्ध म्हणजे नैतिक मूल्यांच्या रक्षणासाठी मानवाने स्वतः विरुद्ध तसेच नैतिक मूल्यांबाबत असंवेदनशील असलेल्या मानवा विरुद्ध केलेला हत्यारबंद अथवा वैचारिक संघर्ष. हा संघर्ष स्वतःपासून सुरू होतो, स्वतःतल्या दुर्गुणांविरुद्ध लढणे ही धर्मयुद्धाची पहिली पायरी आहे. तर समाजातल्या दुर्गुणांविषयी लढने ही ओघाने येणारी दुसरी पायरी आहे.
कुराण या धर्मग्रंथात जिहाद (धर्मयुद्ध) चे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत.....
1) जिहाद-ए- अकबर,
2) जिहाद-ए- असगर.
1) जिहाद-ए-अकबर  :
     जिहाद - बिन - नफ्स/कलब्
नफ्स म्हणजे हृदय तर कलब् म्हणजे आत्मा, आपले हृदय व आत्मा याच्या शुद्धीसाठी म्हणजेच स्वदुर्गुणांविरुद्ध केलेला संघर्ष.
    
2) जिहाद-ए- असगर :
     अ) जिहाद-बिल-लिसान
           लिसान म्हणजे जीभ (जिंव्हा),
स्वतःच्या दुर्गुणांविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आपल्यात झालेले सकारात्मक बदल इतरांना कथन करा व समाजतल्या दुर्गुणांविरुद्ध लढा.
      ब) जिहाद-बिल-कलम/इल्म
कलम म्हणजे लेखणी व इल्म म्हणजे ज्ञान,
आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचू शकत नाही, म्हणून आपली लेखणी आणि ज्ञानपूर्वक विचारांमार्फत समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचून दुर्गुणांविरुद्ध लढणे.
      क) जिहाद-बिल-याद
            याद म्हणजे हात,
समाजावर अनेक संकटे येतात तेव्हा त्या संकटांविरुद्ध लढून माणुसकीचे रक्षण करा.
उदा. पूर, भूकंप आदी आस्मानी संकटे कोसळतात त्यावेळेस समाजबांधवांच्या मदतीसाठी धावून जा, ह्या वेळेस मार्गदर्शनाबरोबर प्रत्यक्षात हातांनी मदत करा. असल्या संकटांविरुद्ध हातांनी लढा.
       ड) जिहाद-बिस-सैफ
            सैफ म्हणजे तलवार (हत्यार)
ह्या जगात कोणत्याही व्यक्तीला युद्ध नकोच असते याचं कारण म्हणजे युद्धामुळे होणारे फायदे कमी पण नुकसान मात्र भरपूर आहे, शिवाय हिंसा होते ती वेगळीच, परंतु काही अशी वेळ येते तेव्हा मात्र शस्त्र संघर्ष हा अनिवार्य होऊन जातो, युद्ध अप्रिय जरी असले अन जर लादले जात असेल तर युद्ध हेकेवळ मानवी मूल्यांच्या राक्षणासाठी लढावे. ( सुराह 2, आयात 216 )
            
कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला तसाच उपदेश ह्या जिहाद मध्ये आहे.
(गीता अध्याय १ : अर्जुन विषाद योग, अध्याय २ : सांख्य योग)
           
             इस्लाम हिंसेच समर्थन केव्हाही करत नाही ...
            ( सुराह 5, आयात 32 ) यात असे नमूद केले आहे की जर तुम्ही कोणत्याही कारणास्तव एखाद्या निरपराध व्यक्तीची जर हत्या केली तरी तुम्ही पूर्ण मानवतेची हत्या केली असे समजा, अन जर एखाद्याला जीवनदान दिले तर संपूर्ण मानवतेची सेवा केली असे समजा.
प्रशांत कळवणकर
7020388324
           

No comments:

Post a Comment